मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेचं क्रेडिट असेल, असंही ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्य सरकारने चार हजार पोस्टकार्ड पाठवली. याबद्दल भाजपा नेते विनोद तावडे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. २७ फेब्रुवारी जवळ आल्यावर मराठी भाषा दिन आठवतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. प्रामाणिक प्रयत्न करायचे झाल्यास त्यावर नियमित काम करत राहावं लागतं, असा खोचक टोलाही तावडेंनी लगावला आहे.
यावेळी बोलताना तावडे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेचं क्रेडिट असेल. दिल्लीत जाताना सर्वांना सोबत घेऊन जायला हवं. मात्र, तसं होताना दिसत नाही. मराठी भाषेसाठी सर्वपक्षीय लोकांनी जायला हवं होतं. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना राजकीय स्टंटबाजी करत आहे. विरोधक सोडा पण किमान सत्तेत असणाऱ्यांना तर सोबत घेऊन जायला हवं होतं. ५ दिवस आधी हालचाली होतात. दिल्लीत जाणं येणं सुरु होतं. याचा अर्थ फक्त क्रेडिट घेण्यासाठीच राजकारण सुरु आहे. ५ दिवस आधी काम सुरु करता, मग ३६० दिवस काय करत असता? असा खोचक सवाल तावडे यांनी सुभाष देसाई यांना केला.
हेही वाचा – “…तर योग्य ती कारवाई करू”; किरीट सोमय्या- संजय राऊत शाब्दिक युद्धाबद्दल रुपाली चाकणकरांनी फटकारलं
संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातला शाब्दिक चिखलफेकीवरही तावडे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ज्या पद्धतीनं शिव्यांचं राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला अभिप्रेत नाही. राजकारणातील बदललेल्या भाषेमुळं महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. हे सगळं टाळून मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ शकतं. संजय राऊत हे संपादक आहेत, माझे मित्र आहेत. पण ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत एवढं नक्की! हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा महाराष्ट्र आहे का?