पुणे शहर आणि जिल्ह्यात जवळपास बंद झालेल्या शालेय सहली पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या शाळांना विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करायच्या आहेत, त्यांना राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन केल्यावरच सहलींचे आयोजन करता येणार आहे.
सहलींसाठी बंधने का?
पुण्यातील एका महाविद्यालयाच्या सहलीसाठी मुरूड येथे गेलेल्या चौदा विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहली आयोजित करण्यासाठी अनेक बंधने लादण्यात आली होती.
आधी प्रस्ताव; मग परवानगी
शाळांकडून सहलींचे आयोजन न करता पालक-शिक्षक संघातर्फे केले जात होते. सहलींच्या आयोजनासाठी राज्य सरकारने घातलेल्या अटी आणि शर्थी अधिक कठोर असल्याने शाळांचे नाव पुढे न करता सहलींचे आयोजन केले जात होते. मात्र, आता शिक्षण विभागाने सहलींसाठी परवानगी देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी केवळ सहलीपूर्वी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
सहलींसाठी नियम काय?
– शाळांनी सहलींचे आयोजन करताना सर्वप्रथम इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घेणे बंधनकारक.
– सहलींसाठी केवळ राज्य मार्ग परिवहन मंडळाचीच (एसटी) वाहने वापरणे अनिवार्य.
– टेकडी, तलाव, समुद्रकिनारा, पर्वत या ठिकाणी सहली नेताना शाळांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
– वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे समीकरण साधून तेवढे शिक्षक सहलीला उपस्थित राहतील, याची काळजी घ्यावी लागणार.
‘अव्वाच्या सव्वा शुल्क नको’
– शाळांकडून सहलींसाठी आकारण्यात येणारे शुल्क विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणारे असावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
– सहलीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये.
– सहलीला येणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने करण्यात येऊ नये.
सहलीबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या अटी आणि शर्थी ज्या शाळा पूर्ण करतील, त्यांनाच आयोजनाची परवानगी दिली जाईल. सहलीच्या आयोजनापूर्वी शिक्षण विभागाला पूर्वकल्पना देऊन प्रस्ताव सादर करणे शाळांना बंधनकारक आहे.
– औदुंबर उकिरडे, उपसंचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
सहल आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन करणे शाळेला बंधनकारक आहे. यातील काही नियम आणि अटींची पूर्तता करणे शाळांच्या दृष्टीने अवघड आहे. त्यामुळे त्यात बदल होणे अपेक्षित असून, शाळा सर्व प्रकारची काळजी घेऊनच सहल आयोजित करतील.
– महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ