पुणे : कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने जीवघेणे अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अचानक या परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांच्या पाहणीनंतर लगेचच स्वामीनारायण मंदिराजवळ भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी प्रशासनाला दिले.
कात्रज बोगदा ते नवले पूल या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सातत्याने अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवडय़ात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय), प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे महापालिका, वाहतूक पोलीस अशा संबंधित यंत्रणांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये या परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजना पुढील १५ दिवसांत करण्याचे आदेश दिले होते. तसेच या उपाययोजना केल्या किंवा कसे, याबाबत अचानक भेट देण्याची तंबीही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली होती. त्यानुसार बुधवारी डॉ. देशमुख यांनी या परिसरात अचानक भेट देऊन आढावा घेतला. एनएचएआय, महानगरपालिका, वाहतूक पोलिस आणि आरटीओचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नवले पूल ते दरी पूल, नवीन कात्रज बोगदा ते खेड शिवापूर पथकर नाकामार्गे महामार्गावरील रस्यावर प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. तसेच नियमित होणारे अपघात, अतिक्रमण, कचरा, पर्यायी मार्गावरील समस्या आणि नऱ्हे स्मशानभूमीच्या जागेची देखील पाहणी करत आढावा घेतला.
दरम्यान, जिल्हाधिकारी अपघातप्रवण ठिकाणांना भेट देऊन काही काळ उलटत नाही, तोच स्वामीनारायण मंदिराजवळ भीषण अपघात होऊन दोन जणांना जीव गमवावा लागला. भरधाव ट्रकने धडक दिल्याने सदाशिव चनबा सैय्या रायचुरकर (वय ५०, रा. बाणेर-बालेवाडी) आणि प्रियंका मोहन सुखदेवे-हाटेनवार (वय २९, रा. ताथवडे) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
नवीन कात्रज बोगद्यातून जड वाहनांची वेगात वाहतूक सुरू असते. त्यात महामार्गावर उतार आहे. वाहनांचा वेग वाढल्याने चालक इंधन बचतीसाठी इंजिन बंद करतात. परिणामी अचानक पर्यायी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनामुळे नियंत्रण सूटून अपघात होत असल्याचे आरटीओने निदर्शनास आणून दिले आणि बुधवारच्या पाहणीतही दिसून आले. तसेच अपघाती क्षेत्रांची ‘एनएचएआय’कडून निश्चिती करण्यात आली असून त्यावर नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
The post जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर लगेचच नवले पूल परिसरात अपघात ; दोन जणांचा मृत्यू appeared first on Loksatta.