देशभरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील ७४ टक्के किशोरवयीन मुलांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ३९ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लसीकरण कार्यक्रमाच्या विस्तारामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाल्याचेही ते म्हणाले.
कोरोना लसीचा पहिला डोस ९८.९ टक्के प्रभावी आहे. तर दुसरा डोस ९९.३ टक्के प्रभावी आहे. लसीकरण, आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील करोना केसेसे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले.
नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले की, ‘आता लसीकरण वेगाने वाढत आहे आणि देशात करोना रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, रिसॉर्ट्स, आर्थिक घडामोडी आणि समाजातील सामान्य कार्ये सुरू केली पाहिजेत. तसेच या काळात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.’
सध्या देशातील २९ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या वर आहे.तर ३४ जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सरकार आणि समाजाच्या सोबतीने भारताने इतर देशांमध्ये दिसणारे करोनाचे संभाव्य घातक परिणाम टाळले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.
ऑफलाइन शाळा सुरु करण्यास परवानगी
करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार ४ मार्चपासून राज्यातील सर्व शाळा ऑफलाइन माध्यमातून सुरु झाल्या आहेत. यासोबतच पूर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी शाळांना देखील ऑफलाइन वर्ग सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील शाळांचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यात परवानगी देण्यात आली होती. यावेळी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक होते. तसेच शाळा सुरु करताना नियमावली तयार करण्यात आली होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागात ऑफलाइन शाळा सुरु झाल्या नव्हत्या.