उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्यावरून पालक आणि शाळा प्रशासनामध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वर्षी करोनामुळे शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घेण्यासाठी शाळांनी एप्रिल आणि मे महिन्यांत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये पालक आपल्या मुलांना घेऊन सहलीसाठी किंवा नातेवाइकांकडे जातात. यंदा सुट्ट्यांमध्ये शाळा सुरू राहणार असल्याने पालकांकडून त्याला विरोध होत आहे. शाळा उन्हाळ्याऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करा, अशी मागणीही पालक करीत आहेत.
अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, तर पुन्हा पालकच शाळेच्या शिक्षकांना दोषी ठरवतात. अशा परिस्थितीत जर एक वर्ष शाळा उन्हाळी सुट्यांमध्येही सुरू राहिली, तर पालकांनी हरकत घेण्याचे काहीच कारण नाही, असे शाळांकडून सांगण्यात येत आहे. हा वाद आता शिक्षण विभागाकडे गेला असून, यावर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
‘…तर अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही’
अनेक शाळांमध्ये पुरेसे ऑफलाइन शिक्षण झालेले नाही. ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे शालेय प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. असे असताना अभ्यासक्रम पूर्ण न करताच थेट जूनमध्ये शाळा सुरू केल्या, तर पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घ्यावी लागेल. त्यात आणखी दोन महिने द्यावे लागतील. त्यामुळे विद्यार्थी पुढील इयत्तेतील शिक्षण जूनऐवजी ऑगस्टनंतरच सुरू होईल आणि त्या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती शाळांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात शाळांना सुट्टी राहणार की, शैक्षणिक वर्ग सुरू राहणार, याबाबत येत्या दोन दिवसांत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात येतील. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
– दिनकर टेमकर, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
उन्हाळी सुट्ट्या मोठ्या असल्याने अनेक पालक आपापल्या गावाला किंवा सहलीला जातात. याच काळात मुलांना पोहणे, क्रीडाविषयक आणि इतर शिबिरांनाही पाठवले जाते. दोन वर्षे करोनामुळे ही शिबिरे झालीच नाहीत. या वर्षी शाळा महिनाभराने वाढवल्याने पालकांचे नियोजन कोलमडले आहे. शाळा सुरू ठेवायचीच असेल तर ती ‘ऐच्छिक’ असली पाहिजे.
– सुचित्रा जोशी, पालक (नाव बदलून)
पालकांचा विरोध कशामुळे?
अनेक पालक उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवायचे, या काळजीने शाळा बंद करण्याची मागणी करीत आहेत. पण ही खरेच काळजी आहे की, पालकांना सुट्टीचे बेत रद्द करावे लागणार असल्याचा मनस्ताप आहे, याचेही उत्तर शोधण्याची गरज असल्याचे काही शिक्षक, मुख्याध्यापकांकडून सांगितले जात आहे.