‘गेल्या सरकारच्या काळात सरकारी पदभरतीच्या प्रक्रियेत पेपरफुटीसारखे गैरप्रकार झाले. पेपरफुटीसारखे प्रकार होत असल्यास, हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असून, त्यासाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’सारख्या कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.
या कंपन्यांच्या विरोधात देशभरात एकही तक्रार नाही. पुण्यामध्ये पदभरती प्रक्रिया हा संवदेनशील विषय असून, कोचिंग क्लासची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही काही क्लासचे अजेंडे असतात. मात्र, यातूनही मार्ग काढून पदभरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात येईल,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नवे कुलगुरू, प्राध्यापक लवकरच
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २११ प्राध्यापकांच्या रिक्तपदांना २०१९मध्येच मान्यता देण्यात आली. मात्र, अडीच वर्षांत फारशी कार्यवाही झाली नाही. आता ही सर्व पदे तातडीने भरण्यात य़ेतील. कुलगुरू निवड प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेप्रमाणे होण्यासाठी सार्वजनिक विद्यापीठाच्या कायद्यात तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या काळात कुलगुरू निवड प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील. तोपर्यंत प्रभारी कुलगुरूंमार्फत सक्षम कारभार चालविण्यात येईल,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.