कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर, २०२२मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आत्तापर्यंत ९९ हजार १५१ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाइन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही लोढा यांनी सांगितले. ऑक्टोबर, २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
विभागवार नोकऱ्या
मुंबई विभाग : ४४५५
नाशिक : १३६२
पुणे : १२,६२२
औरंगाबाद : २७३९
अमरावती : ३१६
नागपूर : ३१