प्रवेश घेतल्यानंतर अवघा २० टक्के अभ्यासक्रम पूर्ण होतो न होतो, तोच एमए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर पहिली सत्र परीक्षा देण्याची वेळ आली आहे. नाशिक विद्यापीठामार्फत २८ फेब्रुवारीपासून परीक्षांचे नियोजन करण्यात आले असून, अर्धवट अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करीत असून, बुधवारी या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ उपकेंद्रावर थेट धडक देत समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांची भेट घेतली.
सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामार्फत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात महाविद्यालयांना सुट्या लागल्या आणि सुट्यांनंतर लगेचच विद्यापीठामार्फत पहिल्या सत्र परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर विद्यापीठाने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये एमए प्रथम वर्षासाठी २८ जानेवारीपासून परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
सुट्या संपून डिसेंबरमध्ये महाविद्यालये सुरू झाल्यानंतर अवघा २० टक्के अभ्यासक्रम शिकवून झाले असून, या नियोजनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण न होताच परीक्षा देण्याची वेळ आली आहे. तसेच लेखी परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना इंटर्नल परीक्षेलाही सामोरे जावे लागत आहे. अनेक विषयांच्या इंटर्नल परीक्षा २६ जानेवारीपर्यंत म्हणजेच लेखी परीक्षेपूर्वी दोन दिवसांपर्यंतही सुरू राहणार आहेत.
या सर्व प्रकाराबाबत महाविद्यालये मात्र केवळ विद्यापीठाकडून आलेल्या सूचनांचे पालन करीत आहे. या विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांची मागणी उपकेंद्रामार्फत परीक्षा विभागाकडे पोहचविली जाणार असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले. यावेळी पूर्वा खर्डीकर, स्वामी कलंके, प्रियंका पारख यासह एमए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
केवळ सारांश अध्ययन
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रम उरकण्यासाठी अनेक प्राध्यापकांनी पूर्ण अभ्यासक्रम न शिकविता केवळ त्याचा सारांश विद्यार्थ्यांना सांगितल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे शिकविल्या गेलेल्या अभ्यासक्रमाचे आकलनही योग्य पद्धतीने झाले नसल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली. शिक्षक आपल्या शिकविण्याच्या जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी असे मार्ग शोधत असून यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे या विद्यार्थ्यांनी ‘मटा’ला सांगितले.