या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी १० काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विभागीय स्तरावर एक किंवा दोन काऊन्सेलरची नियुक्ती करण्यात आली होती. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आली.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले होते. एकूण २१,३४९ इतक्या परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना व शिक्षण तज्ज्ञांशी सतत संपर्कात राहून परीक्षा कशाप्रकारे घेण्यात येतील याचे आयोजन केले जात होते. यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा मंडळाचे अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिक्षण विभागाचे अधिकारी विकास गरड, शरद गोसावी, दिनकर पाटील, दत्तात्रय जगताप, अशोक भोसले, कृष्णकांत पाटील,महेश पालकर, राजेश कंकाल, विवेक गोसावी, संदिप संघवे, अनिल साबळे, सुभाष बोरसे यासारखे अनेक अधिकारी गेली दोन वर्षे करोनाच्या काळात सतत कार्यरत राहून शिक्षण विभागाची धुरा संभाळल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शिक्षक आणि अधिकाऱ्याच्या सुचनांनुसार प्रथमच ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करावी अशी सुचना करण्यात आली. काम आव्हानात्मक होते. गैरप्रकार होतील. परीक्षा सुरळीतपणे पार पडणार नाहीत, काँपीचे प्रमाण वाढेल, परीक्षेची विश्वासार्हता संपुष्टात येईल अशी आवई उठवण्यात आली. विद्यार्थ्यांना हाताशी धरून राज्यात आंदोलन करण्यात आले. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने राज्यातील दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. गैरप्रकारांना आळा बसला. शिक्षक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांनीही विश्वासार्हता जपल्याची माहिती देण्यात आली.
शिक्षण विभागाचे भरारी पथक, शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अधिकारी वर्ग व मुख्यध्यापक या सर्वांनीच परीक्षा काळात जबाबदारीने उल्लेखनीय कामगिरी केली. याचे फलीत म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समन्वयाने कोरोनाकाळातील कठीण परीक्षा पार पाडली.