भगवद्गीतेमधील मूल्ये आणि तत्त्वे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने आहे. या धोरणानुसार, विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान वाटावा यासाठी त्यांना आधुनिक आणि प्राचीन संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रणालींचा परिचय करून देणे अपेक्षित आहे, असे वाघानी सभागृहात म्हणाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सर्व धर्मांतील लोकांनी प्राचीन हिंदू धर्मग्रंथात वर्णन केलेली नैतिक मूल्ये आणि तत्त्वे स्वीकारली आहेत. त्यामुळे आम्ही इयत्ता सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचे ठरवले आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सर्वांगीण शिक्षणा’च्या पाठ्यपुस्तकात भगवद्गीतेचा परिचय करून दिला जाईल. तर, इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रथम भाषेच्या पाठ्यपुस्तकात कथाकथनाच्या स्वरूपात ते सादर केले जाईल.’
भगवद्गीतेवर आधारित प्रार्थना, श्लोक पठण, आकलन, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा यासारखे उपक्रमही शाळा आयोजित करतील. त्यासाठी शाळांना पुस्तके आणि ऑडिओ-व्हिडीओ सीडी यासारखे अभ्यास साहित्य सरकारकडून पुरवले जाईल, असे वाघानी म्हणाले.
कर्नाटक करणार तज्ज्ञांशी चर्चा
शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याच्या गुजरातच्या निर्णयानंतर, कर्नाटकचे माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शुक्रवारी सांगितले की, असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकार शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करेल. मुलांमध्ये सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याचा दावा करीत ते म्हणाले, ‘नैतिकशास्त्राचा अभ्यास सुरू करावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करून घेऊ.’