महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांनी मलिक यांनी ईडीच्या कार्यालयात नेले. त्यांनर नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण अंडरवर्डशीही संबंधित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होते. या मंत्रीमंडळातील लोकांचे सर्वांसोबत संबंध आहेत. आता क्रमाने एकएकजण आत जाणार. तुम्हाला भरपूर बातम्या मिळणार. नवाब मलिकांचे अनुकरण आपल्या जिल्ह्यातील कोणी करु नये. तेव्हा काय बोलत होते. आता बोला ना म्हणाव त्यांना ईडीसमोर. हातात विडी देतील प्यायला,” असे नारायण राणे म्हणाले.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. “ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या परखड नेतृत्वाचा वारसा असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
The post “आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया appeared first on Loksatta.