बलाढ्य ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असं वाटत असतांना भारताने शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी झगडवले
आजच्या सामन्यामुळे विश्वचषक चषकाचा मुख्य दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या चार संघात स्थान निश्चित केले आहे, सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. भारताने दिलेले २७८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहा गडी आणि ३ चेंडू राखत पार केले. असं असलं तरी भारतीय खेळाडूंनी शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला या विजयासाठी झगडवले.
भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं होतं. भारताने ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या. कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया यांनी अनुक्रमे ६८, ५७ आणि ५९ धावा केल्या. यामुळे भारताला ऑस्ट्रेलिया समोर मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाला भारत रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या बिनीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी तब्बल १२१ धावांची भागीदारी केली. हिली हिने ६५ चेंडूत ७२ तर हायन्सने ५३ चेंडूत ४३ धावा केल्या. या दोघींनीही धावगती ही सहाच्या पुढे ठेवली होती. मात्र दोन धावांच्या अंतराने या दोघीही बाद झाल्या आणि ऑस्ट्रेलियाची धावगती ही सहाच्या खाली आली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विकेट जरी पडत नसल्या तरी धावांसाठी ऑस्ट्रेलियाला झगडावे लागले होते. एका बाजूने कर्णधार लेनिंनचा संयमी खेळ सुरु होता. दरम्यान पावसामुळे काही मिनीटे खेळ थांबवावा लागला.
असं असलं तरी जिंकण्यासाठी आवश्यक धावा आणि बाकी राहिलेले षटकं याचं गणित हे एकत्रित चाललं होतं. शेवटच्या दोन ओव्हर बाकी असतांना शतकापासून ३ धावांच्या अंतरावर लेनिन ९७ वर बाद झाली. शेवटच्या षटकात आठ धावांची आवश्यकता होती. तेव्हा भारत चमत्कार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र कुठलीही गडबड होऊ न देता दोन लागापोठ चौकार खेचत तीन चेंडू राखत ऑस्ट्रेलियाने हे आव्हान पार केले.
भारताचे दोन सामने बाकी असून गुण तालिकेमध्ये दोन विजय आणि तीन पराभव बघितलेला भारत अजुनही तिसऱ्या स्थानी आहे. तेव्हा सेमी फायनलचे तिकीट नक्की करण्यासाठी भारताला पुढचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहेत.