खोत यांच्या विधानावर शेट्टी यांनी, फालतू लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही असे म्हणत हेटाळणी केली.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात गुरुवारी पुन्हा एकदा जुंपली. सरकारमध्ये राहून विरोधात आंदोलन करणारे सत्तेत राहण्याच्या लायकीचे आहेत का? असा टोला सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना लगावला. अशा लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, असे म्हणत शेट्टी यांनी सदाभाऊंना टोलवले.
राज्यशासनाने उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. याला माजी कृषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोध केला असून शिर्डी येथून आंदोलन करणार असल्याचे घोषित केले. या पत्रकार परिषदेत त्यांना राजू शेट्टी यांनी महावितरण विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत विचारणा केली. त्यावर खोत म्हणाले, सत्तेतील लोकांना जनतेला सुसह्य होणारी धोरणे राबवण्याचे काम करायचे असते. सध्या सत्तेत असणारे लोकच आंदोलन करीत असल्याने सरकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे लोक सरकार चालवण्याच्या लायकीचे आहेत का. मागे एकदा सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करून पुणे-मुंबई आत्मक्लेश यात्रा केली होती. तशी आताच्या सरकारविरुद्ध आत्मक्लेश यात्रा कधी सुरू केली जाणार, असा प्रश्न त्यांनी शेट्टी यांना उद्देशून केला.खोत यांच्या विधानावर शेट्टी यांनी, फालतू लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही असे म्हणत हेटाळणी केली. शेट्टी म्हणाले, १९९२ पासून मी चळवळीत आहे. ज्यांचे प्रश्न सोडवले त्यांना माझ्या कामाची माहिती असल्याने इतर कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. वीज प्रश्नाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी विशद करताना ते म्हणाले, सत्यशोधन समितीने शेतकऱ्यांचे विजेचे बिल वाढवून दिले असल्याचे नमूद केले आहे. ते दुरुस्त करण्याची आमची मागणी आहे. राज्य शासनाने हे काम केले पाहिजे. ते काही शेतक-यांवर उपकार करत नाहीत.