७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटांचा वेळ, ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.
नाशिक : दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळ पुन्हा एकदा लेखी परीक्षेकडे वळले आहे. इयत्ता १२वीची परीक्षा सुरू असताना मंगळवारपासून इयत्ता १०वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवितानाही कॉपी करण्याचे प्रकार यंदा मात्र घडले नाहीत. त्यामुळे नाशिक विभागात परीक्षेचा पहिला दिवस कॉपीविना पार पडला.
मर्यादित वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका लिखित स्वरूपात सोडविण्याचा सराव सुटल्यामुळे मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून दिला आहे. ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटांचा वेळ, ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे. अपंग विद्यार्थ्यांना प्रतितास २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे. याशिवाय शाळा तेथे परीक्षा केंद्र करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टय़ा मोठा दिलासा मिळाला आहे.
इयत्ता १०वी परीक्षेसाठी यंदा जिल्ह्यातून ९३,७०८ विद्यार्थी बसले आहेत. त्यासाठी नियमित २०३ आणि एक हजार ७७ उपपरीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमिक शालेय जीवनातील महत्त्वाची परीक्षा म्हणून इयत्ता १०वी परीक्षेकडे पाहिले जाते.
करोनाच्या सावटाखाली यंदा संपूर्ण शैक्षणिक वर्ष गेले असताना शाळास्तरावर इयत्ता १०वीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून घेताना शिक्षकवर्गाचा कस लागला. सराव परीक्षा घेणे, मुलांचे समुपदेशन, परीक्षेची भीती जाण्यासाठी व्याख्यान घेणे, आदी कामेही त्यांना करावी लागली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण
मंगळवारी परीक्षेसाठी केंद्रांवर येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण दिसून येत होता. पालकांसोबत वेळेआधीच परीक्षा केंद्र गाठत आपला क्रमांक कोणत्या वर्गात आहे, याची पाहणी करण्यात आली. या वेळी पालकांकडून शेवटच्या क्षणापर्यंत सुचनांचा भडिमार सुरू होता. काही पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर घरी परतले. परीक्षा सुरू झाल्यानंतर केंद्राबाहेर असणाऱ्या गर्दीवर भरारी पथकासह पोलिसांचीही नजर राहिल्याने गर्दी पांगली. मातृभाषेची परीक्षा असतानाही कॉपी केली जात असल्याचा इतिहास आहे. यंदा मात्र नाशिक विभागात पहिल्या दिवशी कॉपीचा अहवाल निरंक राहिला. काही केंद्रांवर विद्यार्थी अनुपस्थित राहिले असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सचिव राजेंद्र आहिरे यांनी दिली.