मुंबई : Bharat Bandh Bank strike: भारत बंदचा बँक-विम्यापासून या सेवांवर परिणाम होणार आहे. आज आणि उद्या भारत बंद राहणार आहे. या संपात बँकिंग संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी आज सोमवार आणि मंगळवारी भारत बंदची घोषणा केली आहे. या संपात बँक युनियनही सहभागी होणार आहेत. बंदमुळे बँकांचे कामकाजही दोन दिवस ठप्प होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांच्या अनेक मागण्या आहेत. यात सरकारने कामगार संहिता रद्द करावी, कोणत्याही प्रकारचे खासगीकरण त्वरित थांबवावे, नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन (NMP) मोडून काढावी आणि मनरेगा अंतर्गत वेतनाचे वाटप वाढवावे आणि कंत्राटी कामगारांना नियमित करावे, याचा समावेश आहे.
भारत बंदचे कारण काय?
खासगीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आणि बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक-2021 च्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँका संपावर आहेत. पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेनेही संपामुळे सामान्य कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. बँकिंग क्षेत्रात, एसबीआयने एक निवेदन जारी केले आहे की, बंदमुळे बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.
भारत बंदचा थेट परिणाम होण्याची शक्यता
कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने देशव्यापी संप पुकारला आहे.
बँकांव्यतिरिक्त, स्टील, तेल, दूरसंचार, कोळसा, पोस्ट, आयकर, तांबे आणि विमा यासारख्या इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. यासोबतच रेल्वे आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित संघटनाही या बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरू शकतात. यासोबतच रस्ते, वाहतूक कर्मचारी आणि वीज कामगारांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत बंदमध्ये बँक कर्मचारीही सहभागी होणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या योजनेला तसेच बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ बँक युनियन संपात सहभागी होत आहेत.
ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी पीटीआयला सांगितले की, भारत बंदमध्ये 200 दशलक्षाहून अधिक औपचारिक आणि अनौपचारिक कामगारांचा सहभाग अपेक्षित आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी ग्राहकांना माहिती देणारी विधाने जारी केली आहेत की सोमवार आणि मंगळवारी बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.
ऊर्जा मंत्रालयाने आज सर्व सरकारी कंपन्या आणि इतर एजन्सींना सतर्क राहण्यास सांगितले, चोवीस तास वीज पुरवठा आणि राष्ट्रीय ग्रीडची स्थिरता सुनिश्चित करा. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की रुग्णालये, संरक्षण आणि रेल्वे यासारख्या अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा सुनिश्चित केला जावा आणि कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
पश्चिम बंगाल सरकारने कर्मचाऱ्यांना सोमवार आणि मंगळवारी ड्युटीवर येण्यास सांगितले आहे. भारत बंद असूनही राज्यातील सर्व सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. आपल्या निवेदनात, बंगाल सरकारने असेही म्हटले आहे की 28 आणि 29 मार्च रोजी कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणतीही प्रासंगिक रजा किंवा अर्ध्या दिवसाची रजा दिली जाणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याने सुटी घेतल्यास तो आदेशाचे उल्लंघन मानला जाईल आणि त्याचा परिणाम त्याच्या पगारावरही होईल, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
भारतीय मजदूर संघ या संपात सहभागी होणार नाही ही दिलासादायक बाब आहे. संघाने सांगितले की, भारत बंदच्या राजकारणाने प्रेरित आहे आणि निवडक राजकीय पक्षांचा अजेंडा पुढे नेणे हा त्याचा उद्देश आहे.
अखिल भारतीय असंघटित कामगार आणि कर्मचारी काँग्रेसने देशव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे बंदमध्ये सहभागी असलेल्या घटकांच्या मागण्यांच्या बाजूने बोलतील असे सांगण्यात आले.