मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याबाहेरही हे प्रकरण पोहोचल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी शरद पवार यांना फोन करत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक घेतली. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना फोन केला. दोन्ही नेत्यामध्ये जवळपास पाच मिनिटं चर्चा झाली आहे. यावेळी ईडीने केलेल्या कारवाईचा ममतादीदींनी विरोध दर्शवला आहे.
या लढाईत आपण सोबत असल्याचे ममतादीदींनी शरद पवारांना सांगितले. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ममतादीदींनी फोन करून राष्ट्रवादीसोबत असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सुद्धा हजर होते. या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.
The post नवाब मलिकांच्या अटकेची बातमी कळताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; पाच मिनिटांच्या चर्चेत म्हणाल्या…. appeared first on Loksatta.