“महाराष्ट्रात शरद पवार हेच दाऊदचा माणूस,” असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला होता.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची अटक आणि त्याचा कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमशी जोडला जाणारा संबंध यामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय. त्यानंतर बराच वाद सुरू आहे. याचसंदर्भातला एक व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला आहे.
आपल्या ट्विटर हँडलवरून मिटकरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करत आहेत आणि शरद पवार व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मिटकरी म्हणतात, मुंबई ला दाऊद पासुन कुणी वाचवलं ऐका खुद्द मोदींच्या तोंडून…देवेंद्र फडणवीस व उर्वरीत गँग उत्तर देईल का? तर या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, एक चांगले प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई जी आपली आर्थिक जीवनाला गती देणारी नगरी आहे. एक काळ असा होता की अंडरवर्ल्डने या मुंबईला उध्वस्त केलं. मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय असा अंधःकार समोर होता. आणि मी सांगतो शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होतं की त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं, बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं.
या संदर्भातलं निलेश राणेंचं विधान काय होतं?
“मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का ? मग नवाब मलिक कोण आहेत. नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.