जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणामध्ये नाशिक जिल्ह्यातून १ हजार ६३२ विद्यार्थी अन्य जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अन्य जिल्ह्यांमधून नाशिक जिल्ह्यात २५९ विद्यार्थी स्थलांतरित झाले असून, या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जाणार आहे.
नोव्हेंबर महिन्याचा कालावधी हा रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी स्थलांतरित होण्याचा कालावधी असतो. या काळात रोजगाराच्या शोधासाठी अनेक कुटुंबे बाहेर पडतात अन् त्यांच्यासोबत त्यांची मुलेही त्या-त्या ठिकाणी जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी शिक्षण विभागामार्फत २० नोव्हेंबर ते पाच डिसेंबरदरम्यान स्थलांतरीत विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तब्बल १ हजार ६३२ विद्यार्थी स्थलांतर करून अन्य जिल्ह्यामध्ये गेल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये ८४१ मुले व ७९१ मुलींचा समावेश आहे. तसेच २५९ मुले जिल्ह्याबाहेरून नाशिक जिल्ह्यात स्थलांतरित झाली आहेत, ज्यापैकी १६३ मुले आहेत तर ९६ मुली आहेत.
महापालिका शिक्षण मंडळाने केलेल्या महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षणामध्ये ६ मुले व ३ मुले असे एकूण ९ विद्यार्थी शहरातून स्थलांतरित झाल्याची माहिती पुढे आली असून, १५ मुले व १४ मुली असे एकूण २९ विद्यार्थी शहरात स्थलांतरित झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्या-त्या शहर किंवा गावातील शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी शिक्षण हमी कार्ड वितरित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
शिक्षण हमी कार्ड पोहचविणार
जिल्ह्याबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे. आधीची शाळा, शेजारी, त्यांच्या पालकांची कामाची ठिकाणे या ठिकाणाहून हे विद्यार्थी कुठे स्थलांतरित झाले, याचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षण हमी कार्ड त्यांच्यापर्यंत पोहचविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.