MNS Chief Raj Thackeray: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं पहायला मिळतंय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर (Maharastra Politics) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलेच आसूड ओढले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपशी युती करण्याच्या शक्यतेला राज ठाकरे यांनी केराची टोपली दाखवली. त्यावर आता भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? राज ठाकरे आमच्यासोबत येणार नाहीत याचा आनंद आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आयुष्यभर त्यांनी महायुतीत येऊ नये. अशी सदिच्छासुद्धा आहे, असा टोला देखील मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना लगावला.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्याशी भाजपची झालेली युती, तसेच टोलनाके अशा मुद्द्यांवरुनही भाजपला धारेवर धरलं. अजित पवार गेले आता तुम्ही भाजपशी युती करणार का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
राज ठाकरे काय म्हणतात?
माझा पक्ष भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी कोणालाही भेटलं की युती होत नसते हे लक्षात घ्या. अमूक नेता तमूक नेत्याला भेटला म्हणून लगेच युती होत नसते. प्रसारमाध्यमांकडून याची चर्चा केली जात असली तरी या सगळ्याचा आम्हा नेत्यांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणत महायुतीत सामिल होण्यावर पुर्णविराम लगावला होता. त्यानंतर आता मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्याने आता वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे… टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि ‘टोलमुक्त महाराष्ट्र करू’ त्याचं काय झालं ? अजूनही टोलधाड का सुरू आहे ? समृद्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम… pic.twitter.com/csdVDrz5DE
— Raj Thackeray (@RajThackeray) July 26, 2023
आणखी वाचा- टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले ‘हे बोलण्यापेक्षा…’
दरम्यान, टोलनाका फोडणं राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका अशी टीका भाजपाने केली आहे. त्यातच आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं. समोरचा माणूस उद्धटपणे बोलल्याने ती आलेली प्रतिक्रिया आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावेळी राज ठाकरे यांनी नितीन ग़डकरी यांच्यावर टीका देखील केली आहे. केंद्रीय मंत्री मराठी आणि महाराष्ट्रातील असूनही राज्यातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैवी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.