पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापनेचे भाकीत करण्यात आले आहे. दरम्यान, एक्झिट पोलवर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आता हे बॉक्सच (ईव्हीएम) सांगतील की काय व्हायचे आहे, त्यामुळे १० मार्चपर्यंत थांबा, अशी प्रतिक्रिया चन्नी यांनी दिली आहे.
एक्झिट पोल दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीबाबत चन्नी म्हणाले की, “मी आज गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला आलो होतो. आमची मुख्य समस्या बीबीएमबीची आहे. अधिकारी पूर्वीसारखे असावेत, अशी आमची इच्छा आहे. केंद्र सरकारकडून त्यांना बाहेरून लोक हवे आहेत, अशा अडचणी येत आहेत.”
मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की, तुम्ही त्यावर पुन्हा विचार करा. ते म्हणाले की आज त्यांचे मंत्री येथे नाहीत. १ ते २ दिवसात आम्ही आमच्या मंत्र्यांना बोलावून चर्चा करू आणि पंजाबला हवे तसे करू, असे चन्नी पुढे म्हणाले.
एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये कोणाला किती जागा?
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे ऍक्सेस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आपला राज्यात ४१ टक्के मतांसह ७६ ते ९० जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेस केवळ १९ ते ३१ जागा मिळवू शकते. काँग्रेसला केवळ २८ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय भाजपला १ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अनेकवेळा राज्यात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाला केवळ ७ ते ११ जागा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाबमध्ये मोठा बदल होणार असून पहिल्यांदाच ‘आप’ प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
The post Punjab Election : पंजामध्ये आपचे सरकार येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, “काय होणार आहे ते…” appeared first on Loksatta.