वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मिळवलेल्या ३-० अशा निर्भेळ यशाचे श्रेय कर्णधार रोहित शर्माने मधल्या फळीतील फलंदाजांना दिले. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीचेही त्याने कौतुक केले.
अहमदाबादची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. मात्र तरीही पहिल्या दोन सामन्यांत सूर्यकुमारने दिमाखदार फलंदाजी केली, तिसऱ्या सामन्यात श्रेयस आणि ऋषभ पंत यांनी कामगिरी उंचावली, असे रोहितने सांगितले. ‘‘मधल्या षटकांना सामोरे जाणे आव्हानात्मक होते. परंतु मधल्या फळीने परिस्थितीनुसार सकारात्मक फलंदाजी केली,’’ असे रोहित म्हणाला.
‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार, पाच आणि सहा हे क्रमांक अत्यंत महत्त्वाचे असतात. या क्रमांकांवर भारताच्या काही गाजलेल्या क्रिकेटपटूंनी आपली छाप पाडली आहे,’’ असे रोहितने आवर्जून सांगितले.
विराटची पाठराखण
विराट कोहलीकडून शतकाची अपेक्षापूर्ती होत नाही, ही क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेची बाब असू शकते, परंतु रोहितने माजी कर्णधाराचे सातत्य आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेबद्दल कोणतीही चिंता व्यक्त केली नाही. ‘‘विराटला आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. काय बोलता तुम्ही?’’ अशा शब्दांत रोहित विराटची पाठराखण केली. ‘‘विराटकडून शतक साकारलेले नाही, ही वेगळी बाब आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीत काही समस्या नाही,’’ असे रोहितने सांगितले.
The post मधल्या फळीतील फलंदाजांचे रोहितकडून कौतुक appeared first on Loksatta.