कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढलेली असून देशात तसेच जगभरात कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विनानोड्डाणांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला असून तब्बल २५ महिन्यांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं येत्या २७ मार्चपासून सुरु होतील. सरकारच्या या निर्णयामुळे आता परदेशगमन सोपे होणार असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर इतर देशातील तसेच भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांच्या विमानांना आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करता येईल. तसेच इतर देशातील विमानेदेखील भारतात उतरु शकतील. याबाबत अधिक बोलताना, जगभरात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया हवाई वाहतूकविषयक अधिकाऱ्याने दिली. तर विमानांच्या उड्डाणांना परवानगी दिलेली असली तरी आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
या आधी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर केंद्र सरकार १५ डिसेंबर २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेणार होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सरकारने हा निर्णय घेण्याचे टाळले होते. कोरोना महामारीची लाट आल्यानंतर २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी आहे. तर २० जुलैपासून बायोबबलमध्ये राहून ४० देशांत काही विमानांच्या विशेष उड्डाणाला परवानगी होती.
The post आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणाला केंद्र सरकारची परवानगी, २७ मार्चपासून सेवा सुरु होणार appeared first on Loksatta.