जास्त पैसे देऊन कार्यालयात येण्याची ऑफर आल्यास ती पगारवाढ नाकारु पण वर्क फ्रॉम होम द्या असे ६१ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आयटी, आउटसोर्सिंग, टेक स्टार्टअप्स, कन्सल्टिंग, बीएफएसआय आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी हा अनुभव सांगितला आहे. घरून किंवा रिमोट वर्कींगने काम केल्याने त्यांना वैयक्तिक जीवन आणि नोकरी यांच्यात चांगला समतोल साधण्याची संधी मिळाली आहे. यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाला नाही आणि वैयक्तिक आयुष्य देखील सुखकर झाल्याचे यातील अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कंपन्यांचे काय मत?
करोनाचा कहर कमी झाल्याने कंपन्या हळूहळू कार्यालये उघडत आहेत, पण तरीही त्यांनी घरून काम करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. कंपनीमध्ये प्रतिभावान कर्मचारी टिकवून ठेवणे आणि इतर प्रतिभावान लोकांना समायोजित करणे हा कंपन्यांचा उद्देश आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या उद्योगात नोकऱ्या गमावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि अशा परिस्थितीत कंपन्यांनी हा पर्याय देणे आवश्यक झाले आहे.
एकूण ६२० कंपन्यांच्या साधारण २ हजार कर्मचाऱ्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. घरून काम करणे हा कार्यालयात परतण्याच्या धोरणाचा भाग मानला पाहिजे अशी प्रतिक्रिया सीआयईएल एचआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य मिश्रा यांनी दिली.
आयटी उद्योगातील १० पैकी सहा भरती कर्मचाऱ्यांमध्ये घरातून काम करण्याच्या पर्यायावर चर्चा केली जात आहे. दोन वर्षे घरून काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना याची सवय झाली आहे. आता कंपन्यांना हा पर्याय द्यावा लागणार आहे. अनेक कंपन्या हा पर्याय ठेवण्याचा विचार करत असल्याचे स्पेशलिस्ट स्टाफिंग कंपनी Xpheno च्या कमल कारंत यांनी सांगितले.
सर्वेक्षण केलेल्या ६२० कंपन्यांपैकी ४० टक्के कंपन्यांचे काम पूर्णपणे घरून सुरु आहेत तर २६ टक्के कंपन्या हायब्रिड मोडमध्ये काम करत आहेत. इतर कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास बोलावले आहे. टाटा स्टीलने आपल्या कर्मचार्यांना करोना साथीच्या काळात घरून काम करण्याची परवानगी दिली होती. ही कंपनी सध्या ही व्यवस्था सुरु ठेवू इच्छित आहे.