ठाणे जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण १,३२८ शाळा असून यामध्ये ८० हजार ९९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर यामध्ये ४० हजार ३६९ मुले आणि ४० हजार ६२२ मुली शिक्षण घेत असल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. तर गेल्या चार वर्षांत प्रथम २०२१-२२ मध्ये पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढलेले शासकीय विभागाकडील अहवालावरून समोर आले आहे. करोनानंतर अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले.
त्यानंतर शिक्षण विभागाकडून जुलैमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ग्रामीण परिसरातील केवळ २४६ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळले होते, मात्र सरकारी विभागाकडे शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाचवीमध्ये २.५१ टक्के विद्यार्थी तर आठवीमधील ३.४५ टक्के विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक गळती आहे. इतर इयत्तांमधील विद्यार्थ्यांची गळतीही अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नववीनंतर मुलींच्या शिक्षणातील गळतीमागे नापास होण्याच्या कारणाबरोबरच स्थलांतर, मुलींना दुय्यम वागणूक, सामाजिक रूढी परंपरा, लवकर विवाह, वयात आलेल्या मुलींची असुरक्षितता, शाळा असूनही घरातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती ही कारणंही मुलींच्या गळतीमागे असल्याचे पुढे येत आहे. मात्र आता मुलींबरोबरच मुलांचेही गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे अधोरेखित होत आहे.
एखादा विद्यार्थी सलग तीस दिवस गैरहजर राहिल्यास त्याची गणना गळतीमध्ये होते. ग्रामीण भागामध्ये दिवाळीनंतर रोजगारासाठी होणारे स्थलांतर हे त्या मागचे मोठे कारण आहे. करोना काळानंतर रोजगाराअभावी अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने गळतीचे प्रमाण वाढलेले दिसत असले, तरी गावात वीटभट्टी किंवा इतर कारणांनी स्थलांतरित होऊन आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विनोद लुटे, शिक्षक, शहापूर
गळतीचे प्रमाण टक्केवारीमध्ये
वर्ष ५ वी मुले ५ वी मुली एकूण ८ वी मुले ८ वी मुली एकूण
२०१८-१९ ० ० ० ०.०२ ०.०२ ०. ०२
२०१९-२० ० ० ० ०.०२ ०.०२ ०.०२
२०२०-२१ ०.०३ ०.०२ ०.०२ ०.०४ ०.०४ ०.०४
२०२१-२२ २.३४ २.६९ २.५१ ३.८२ ३.०३ ३.४५