कासा : चारोटी उड्डाणपुलाखालील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते आहे. दर बुधवारी येथे होणाऱ्या आरटीओ कॅम्पमुळे ही कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालघर जिल्ह्यासाठीचे मुख्य आरटीओ ऑफिस विरार येथे आहे. त्यामुळे तलासरी, मोखाडा, चारोटी, जव्हार, विक्रमगड अशा भागातील नागरिकांना विरारला सतत जाणे कठीण होते. त्यामुळेच आरटीओ डहाणू, चारोटी, विक्रमगड, जव्हार अशा ठिकाणी आरटीओ कॅम्पचे आयोजन करते.
चारोटी येथे प्रत्येक बुधवारी वसई आरटीओअंतर्गत कॅम्प लावला जातो. या कॅम्पमध्ये नवीन वाहन परवाना चाचणी, जुन्या वाहनांची नोंदणी अशा आरटीओशी संबंधित कामासाठी शेकडो नागरिक येतात. परंतु या कॅम्पसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने आपल्या कामासाठी आलेले नागरिक आपली वाहने चारोटी उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या सेवा रस्त्यावरच लावतात. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दर बुधवारी मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. याच रस्त्यावर शिकाऊ वाहनचालकांची चाचणीसुद्धा याच रस्त्यावर घेतली जाते. त्यामुळे एखादेवेळेस शिकाऊ वाहनचालकांकडून वाहन नियंत्रित न झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळेच येथे आरटीओ कॅम्पसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. आरटीओ कॅम्पसाठी कासा चारोटी परिसरातील मोकळे मैदान उपलब्ध करून देण्याचा पर्यायही नागरिकांनी सुचवला आहे.
The post चारोटी उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी appeared first on Loksatta.