सुजाण नागरिक घडवण्याचे काम करणाऱ्या गुरुजनांना ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले जाते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. पालघर जिल्ह्यात मात्र शिक्षक दिनाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही, हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा शिक्षक दिनी, ५ सप्टेंबरला आयोजित करणे गरजेचे असते. मात्र गौरीगणपतींच्या विसर्जनाची रजा असल्याचे कारण देऊन हा पुरस्कार सोहळा १४ सप्टेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जिल्ह्यात लागल्यामुळे आचारसंहितेचे कारण देत हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच पुरस्कारांची यादी जाहीर करून पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र आचारसंहिता संपून २० दिवस उलटले, तरी याबाबत शिक्षण विभागाकडून कुठल्याही हालचाली होत नसल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान संपत असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागण्याची आहे. त्यामुळे किमान त्याआधी तरी शिक्षण विभागाने पावले उचलावीत आणि ११ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण दिनी तरी हा पुरस्कार जाहीर करावा, अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा हा ५ सप्टेंबरलाच करायला हवा. राजकीय पुढाऱ्यांना मिरवण्यासाठी हा पुरस्कार पुढे ढकलला. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने जिल्हा परिषद आजतागायत हा पुरस्कार देऊ शकलेली नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, या शब्दांत पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पतपेढीचे माजी अध्यक्ष पी. टी. पाटील यांनी जि. प. च्या कारभारावर टीकास्त्र सोडले. तर किमान ११ नोव्हेंबर या शिक्षण दिनी तरी या पुरस्काराचे वितरण करावे, अशी मागणी या पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी केली.
लवकरच सोहळा
५ सप्टेंबरचा पुरस्कार १४ सप्टेंबरला करण्याचे घोषित केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. पालकमंत्र्यांशी अजूनपर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही. तो झाला की त्यांच्याकडून तारीख घेण्यात येईल व लवकरात लवकर हा पुरस्कार सोहळा करण्यात येईल, असे पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी सांगितले.