मुंबई : सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. यात सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता अससल्याने मध्य व पश्चिम रेल्वेही सज्ज राहिली आहे. यात सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्याबरोबरच एटीव्हीएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर १७८ एटीव्हीएम सुरू करण्यात आली असून रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवा दिली जात असल्याची माहिती देण्यात आली.
करोनाकाळाआधी मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. १५ ऑगस्टनंतर दोन लसमात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता मध्य रेल्वेवर ३५ लाख आणि पश्चिम रेल्वेवर २८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.
प्रवासी संख्या वाढल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने फेऱ्यांमध्ये वाढ केली. मध्य रेल्वेवर दररोज १,८१० आणि पश्चिम १,३७६ फेऱ्या होत आहेत. त्यानुसार तिकीट खिडक्यांमध्ये काहीशी वाढ करतानाच मोबाइल तिकीटही सुरू केले. तर नुकतेच दोन्ही रेल्वे मार्गावरील स्थानकांत मदतनीसांमार्फत मोजक्याच स्थानकात स्मार्ट कार्डमार्फत तिकीट मिळणारे एटीव्हीएमही सुरू केले. सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याची तयारी सुरू असल्याने मध्य रेल्वेने एटीव्हीएमची संख्या वाढवण्यास सुरुवात केल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
The post सर्वानाच लोकल प्रवासासाठी रेल्वेची सज्जता ; राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा appeared first on Loksatta.