Maharashtra Politics : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. सोमवारी नागपुरात (Nagpur) बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याला देवेंद्र फडणवीस कलंकीचा काविळ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेने भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही उद्धव ठाकरे यांना खडसावलं आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही – नितीन गडकरी
“श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,” असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2023
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो असे ते सांगत आहे. आधी उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? 2014 ते 2019 तुमच्याबरोबर सत्तेत होतो. 2014 साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.