ममता बॅनर्जी म्हणतात, “केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या पोपटाप्रमाणे काम करू लागल्या आहेत.”
ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून विरोधकांच्या विरोधात गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या तपास यंत्रणा मात्र आपली कारवाई नेटाने सुरू ठेवून आहेत. नुकतीच ईडीनं तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली असून दिल्लीमधील ईडीच्या मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या तीन ते चार नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात टीका करताना ममता बॅनर्जी यांनी या तपास यंत्रणांना ‘केंद्र सरकारचे पोपट’ म्हटलं आहे.
अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. रुजिरा बॅनर्जी यांनी न्यायालयात ईडीच्या तक्रारीविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना ईडीला बॅनर्जी पती-पत्नीला नोटीस बजावण्याची परवानगी दिली आहे. तसेच, दिल्लीमध्ये त्यांची चौकशी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.
याआधी ईडीनं पश्चिम बंगालचे मंत्री मोलॉय घातक यांना कोळसा घोटाळा प्रकरणात नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं तृणमूलचे बिरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रता मोंडल यांना नोटीस बजावली आहे.
“एक बिहारी सौ बिमारी”; ममता बॅनर्जींच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
ममता बॅनर्जींची परखड टीका
ममता बॅनर्जी यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम करू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. “सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांचा निर्लज्जपणे वापर सुरू आहे. केंद्र सरकार या यंत्रणांना जे काही सांगतं, ते या यंत्रणा करत आहेत. फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होत आहे. विरोधकांना दाबण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर होऊ शकत नाही”, असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.