पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, अधिकारी आणि।पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांनाही चार हिताच्या गोष्टी सांगण्यास पवार यावेळी विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांची मुले झेडपी शाळेत नाहीत, तोपर्यंत आपण पालकांना कसं सांगणार की तुम्ही तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत पाठवा, असं पवार यावेळी म्हणाले. त्याचवेळी करोनानंतर आता नव्या दमाने कामाला लागत शिक्षकांना शनिवार, रविवारीही वर्ग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.