स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचार्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केलं.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलेल्या किमान २०० पर्यटकांना रविवारी दुपारी मधमाश्यांनी चावा घेतल्याची माहिती राज्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी २५ जणांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असताना दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली. पुणे शहरापासून सुमारे ९५ किमी अंतरावर हा किल्ला असून परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे.
पुणे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या किमान तीन मधमाशांच्या पोळ्यांमधून मधमाशांचे थवे बाहेर आले होते. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्यावर काहीतरी फेकते तेव्हा किंवा मोठ्या प्रमाणावर लोक पोळ्यांभोवती जमा झाले की त्या वासामुळे या माश्या बाहेर येतात. त्यामुळे २०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला. सुमारे २५ जणांना अनेक डंखांचा त्रास झाला आहे.”
“काही क्षणातच मधमाश्यांच्या झुंडीने मोठा परिसर व्यापला असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचार्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेक डंख मारलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले, ” असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.