मुंबई : मुंबईतील करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या दोन आकडय़ांच्या घरात आहे. मात्र, यामुळे निश्चिंत न होता महापालिकेने करोनास्थितीवर वेगवेगळय़ा अंगाने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातून वाहून येणाऱ्या सांडपाण्याचे नमुने गोळा करून या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून करोना विषाणूचे अंश आढळतात का, याची पालिका तपासणी करणार आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात पूर्णपणे कमी झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही ५० च्या खाली गेली आहे. करोना संसर्ग अंतर्जन्य स्थितीमध्ये असला तरी संसर्गाच्या रूपामध्ये काही बदल होत आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने पालिकेने शहरातील सांडपाण्याची आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना या संसर्गजन्य विषाणूचे अंश मानवी शरीरातून उत्सर्जन केल्या जाणाऱ्या मूत्रामध्येही आढळून येत असल्याचे विविध संशोधनात्मक अभ्यासातून आढळले आहे. शहरामधील प्रादुर्भावाचा जोर कमी झाला तरी सांडपाण्यामध्ये करोना विषाणूचे अंश आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे.
यासाठी विविध ठिकाणच्या सांडपाण्याचे एक हजार नमुने गोळा करून त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल. त्यात करोनाचे अंश सापडलेल्या नमुन्यांची कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय तपासणी केली जाईल. याद्वारे करोनाच्या रूपामध्ये काही बदल होत आहे का याचाही आढावा घेतला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
अन्य देशांतही पद्धत
शहरातील उदंचन केंद्र (पिम्पग स्टेशन) आणि मॅनहोलमधून हे नमुने घेतले जाणार आहेत. या आधीही जागतिक आरोग्य संघटनेने सांडपाण्याचे नमुने गोळा केले होते. हे सर्वेक्षण तुलनेने कमी खर्चीक आहे. करोनाचा शहरातील प्रसार किती वेगाने होत आहे, याची माहिती घेण्यासाठी अनेक देशांनी सांडपाण्याचे सर्वेक्षण या आधी केले आहे. बाधितांना लक्षणे नसली तरी सांडपाण्यामध्ये याचे अंश आढळून येत असल्यामुळे करोनाच्या बदलत्या स्थितीवर या पद्धतीने लक्ष ठेवणे सोपे आहे.