Sahir Ludhianvi : प्रेमात पडलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी कवी, गीतकार, शायर साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांच्या शायरी किंवा कवितांचा वापर करतो. साहिर यांच्याकडे अफाट शब्दसंपत्ती असूनही त्यांना त्यांचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही. कधी एकतर्फी प्रेमामुळे, तर कधी प्रेम व्यक्त न केल्याने किंवा नात्यात आलेल्या अडचणींमुळे साहिर यांच्या अनेक प्रेम कहाण्या अधुऱ्या राहिल्या आहेत. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) निमित्त जाणून घ्या अझहर जावेद (Azhar Javed) यांनी लिहिलेल्या आणि जमील गुलरेज (Jameel Gulrays) यांनी वाचलेल्या साहिर लुधियानवी यांच्या अधुऱ्या प्रेमकहाण्या…
साहिर लुधियानवी यांच्या अधुऱ्या प्रेम कहाण्या जाणून घ्या… (Sahir Ludhianvi Love Story)
साहिर यांचं पहिलं एकतर्फी प्रेम
साहिर लुधियानवी यांच्यावर पहिली प्रेम करणारी व्यक्ती प्रेम चौधरी होती. लुधियानाजवळील एका गावात राहणारी ती श्रीमंताघरची मुलगी होती. तिचं साहिर यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं. धन, संपत्ती, सौंदर्य अशा सर्व गोष्टी तिच्या हातापायाशी खेळत असल्या तरी तिला या गोष्टींचा कधीच गर्व नव्हता. साहिर तिचे कधी होऊ शकत नाही याचा तिला अंदाज होता तरीही ती साहिर यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होती. पण ‘अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है’ याप्रमाणे एकदिवस साहिर प्रेमच्या घरी पोहोचले. साहिरला आपल्या घरासमोर पाहताच प्रेमला एकाच वेळी आनंदही झाला आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या काळजात धस्स झालं. तू इथून जा नाहीतर माझे वडिल तुझे तुकडे करतील असा संदेश तिने तिच्या मोलकरीणकडून त्याच्यापर्यंत पोहोचवला. मग त्यानंतर साहिर त्या ठिकाणाहून गेला, पण तिला पाहण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली होती.
साहिरवर प्रेमने तिचा जीव ओवाळून टाकला होता, पण तो तिला मिळणार नाही हे तिलाही माहित होतं आणि या प्रेम कहाणीचा शेवट गोड होणार नाही याची साहिरलाही कल्पना होती. शेवटी साहिरच्या व्याकुळतेने प्रेमने आपला जीव सोडला. प्रेमच्या निधनाने साहिर यांनादेखील मोठा धक्का बसला. काय करावं काय नको काही कळत नव्हतं. त्यानंतर ते प्रेमच्या एका मैत्रिणीला भेटले आणि तिला प्रेमचा फोटो आणायला सांगितला. त्यांनी तो फोटो त्यांच्या खोलीत लावला आणि त्या फोटालाच आयुष्याचा एक भाग बनवला.
साहिरची अयशस्वी प्रेमकहाणी…
साहिर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी प्रतिनिधी होते. त्यावेळी त्यांना कळलं की कॉलेजमध्ये असलेल्या ईशा कौर नामक व्यक्तीचा आवाज खूप चांगला आहे. त्यावेळी साहिर ईशाला भेटले आणि तिला त्यांच्या ग्रुपमध्ये सामिल होण्यास सांगितलं. ईशा कौरदेखील श्रीमंत घराण्यातील मुलगी होती. कॉलेज घरापासून लांब असल्याने ती हॉस्टेलमध्ये राहत असे. हे दोघेही एकमेकांना भेटत गेले आणि नंतर त्यांच्यातील प्रेमही फुलत गेलं. पण प्रेमामुळे मैत्रीणी दुरावत असल्याने ईशाला खूप त्रास झाला आणि तिने साहिर यांच्या सोबत बोलणं बंद केलं. साहिर यांनीदेखील ही बाब लक्षात घेतली. ईशाला द्विधा अवस्थेत पाहून त्यांना खूप त्रास व्हायचा. नंतर ईशाने हॉस्टेल सोडलं. पण इकडे साहिर मात्र तिच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे, दिवस-रात्र ते तिच्याच नावाचा जप करायचे.
ईशा आणि शाहिर त्यानंतर कॉलेजमध्ये भेटले पण ही गोष्ट कॉलेज प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि त्यांनी या दोघांनाही कॉलेज सोडण्याचा आदेश दिला. त्यावेळी ईशा घर सोडून साहिरकडे आली पण साहिरने तिला समजावलं आणि घरी परत जाण्यास सांगितले. पण ईशाने घरी जाण्यापेक्षा मुंबईचा रस्ता पकडला आणि एका अनोळखी मुलासोबत लग्न केलं.
अव्यक्त प्रेमकहाणी
अमृता आणि साहिरचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं नाही. अमृता ज्यावेळी साहिर यांना पहिल्यांदा भेटल्या त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं होतं. प्रीतनगरात अर्थात प्रेमाच्या शहरात त्यांची पहिली भेट झाली. साहिर यांच्याकडे शब्दांची श्रीमंती असली तरी प्रेम व्यक्त करण्यात मात्र त्यांचे शब्द अपुरे पडले. अमृता यांनी पत्रं, कविता आणि कथांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. पण साहिर यांच्याकडून त्यांना कधी याबाबत उत्तर मिळालं नाही.
समाजामुळे लग्नाला विरोध
साहिर मुंबईत असताना त्यांच्या आयुष्यात उमताज अजिबा हाजिरा बसू आल्या. साहिर आणि हाजिरा यांचं लग्नदेखील झालं. पण साहिर पंजाबी आणि अमृता लखनवी असल्याने समाजाने त्यांचं नातं फार काळ टिकू दिलं नाही.
नवऱ्यासमोर साहिरला घातली लग्नाची मागणी
साहिर हैदराबादला गेले असताना दख्खनमधील एक मुलगी तिच्या पतीसोबत शाहिरला भेटायला आली. नवऱ्यासमोर तिने साहीरला लग्नासाठी मागणी घातली. ती साहिरसोबत मुंबईला येण्यासदेखील तयार होता. तिचा नवरादेखील तिला तलाक देण्यास तयार होता. साहिरलादेखील हे लग्न मान्य होतं. पण वकिल न मिळाल्याने पुढे काहीच होऊ शकलं नाही.
साहिर यांचं शेवटचं प्रेम
साहिर यांच्या आयुष्यात पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा आल्या. दोघांनी 1961 साली सुखी संसाराची सुरुवात केली. त्यांच्या नात्याची जगभर चर्चा झाली यामुळे साहिरला बदनामीचा सामना करावा लागला. अखेर साहिरने सुधासोबतच्या नात्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर साहिरने एकटं राहण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या