आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) २६ मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, १० संघांच्या या स्पर्धेचा सलामीचा सामना मागील हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळवला जाईल. म्हणजेच गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या मोसमातील उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२१च्या विजेतेपदाच्या सामन्यात, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला.
या मोसमात एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील स्टेडियमवर ५५ सामने, तर पुण्यात १५ सामने खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – IND vs SL : रोहित शर्माची कॅमेरामनसोबत मस्ती; कॉफी पिताना केला ‘असा’ सवाल; पाहा VIDEO
सामन्याचे ठिकाण, प्रशिक्षण स्थळ आणि सांघिक हॉटेलमधील अंतर लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी बीसीसीआयसोबत बैठक झाल्याचे सांगितले.