प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अहमदनगरपाठोपाठ आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या (Aurangzeb) फोटोवरून राडा झालाय. शिवराज्याभिषेक दिनाच्या (Shivrajyabhishek Din) पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली. त्यावरून आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरातील दसरा चौक, टाऊन हॉटल, लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक केली. शिवाय आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केलं. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी सात जून रोजी कोल्हापूर (Kolhapur) बंदची हाक दिलीय.
नगरमध्ये फोटो झळकला
त्याआधी काल अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. नगरमधल्या फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरणूकीत काही तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर झळकावणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे तरुणांनी डिजेच्या तालावर नाचताना हातात औरंगजेबाचा फोटो घेतला होता. तसंच ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणाही दिल्या जात होत्या.
दोन समाजात जीतय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. 505 (2), 298, 34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली जात असून या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
‘हे मान्य केलं जाणार नाही’
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर प्रकार असून औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल, तर हे मान्य केलं जाणार नाही असं म्हटलं आहे. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
अनधिकृत मजारवरुन वाद
दरम्यान, पुण्यातील पर्वती टेकडीवर अनधिकृत मजार आढळली असून यावरुन वाद निर्माण झाला आहे. या मजारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही मजार अनधिकृत असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या संदर्भात वनविभागाला पत्र लिहिण्यात आलं आहे. ही मजार नेमकी कुणाची आहे आणि कोणी बांधली आहे याबाबत माहिती नाही. वनविभागाच्या जागेमध्ये प्रार्थना स्थळ बांधता येत नाही. असं असताना या ठिकाणी ही मझार बांधण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती चौकशी करून अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे