पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली. या बैठकीत पक्षनेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असे म्हटले आले. मात्र, सध्या तरी सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे गांधी कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहेत. या पराभवासाठी त्या एकट्या एकट्या नाहीत. राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे.
“आम्ही सर्वांनी सोनिया गांधींना सांगितले की पाच राज्यांतील पराभवाला त्या एकट्या एकट्या जबाबदार नाहीत. यासाठी गांधी कुटुंब नाही तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
खरगे यांनी सांगितले की, सीडब्ल्यूसीच्या बैठकीत पक्ष मजबूत करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. आम्ही भाजपा आणि त्यांच्या विचारधारेशी लढू, आमची विचारधारा पुढे नेऊ. आम्हाला आशा आहे की पुढच्या निवडणुकीत आम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगली कामगिरी करू.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. संसदेतील विरोधकांच्या भूमिकेवर खरगे म्हणाले की, “आम्ही या चर्चेत सहभागी होऊन जनतेशी निगडित सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडू, अशी आमची रणनीती आहे. जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या समस्या कशा सोडवल्या पाहिजेत. महागाई, बेरोजगारी या सर्व समस्यांवर चर्चा व्हायला हवी.”
दरम्यान, कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावे, यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबावर अविश्वास व्यक्त केला नव्हता. कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणे ही एक प्रथाच बनली आहे.
या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत असे म्हटले. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे. याला दुजोरा देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या कुटुंबीयांसह मी पक्षातील आपले पद सोडण्यास तयार असल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, परंतु आम्ही ते नाकारले.”