ठप्प झालेली देशांतर्गत वाहतूक सुरू
नाशिक : तीन दिवसांपासून रेल्वेगाडी (रेक) उपलब्ध होत नसल्याने देशांतर्गत बाजारात कांदा पाठविणे अवघड झाले असताना कांद्याचे दर गडगडण्यात ही बाब कारक ठरली. याबाबत कांदा उत्पादक शेतकरी फेडरेशनने रेल्वे मार्गाचे निर्बंध मागे घेऊन तातडीने गाडी उपलब्ध करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे देशांतर्गत बाजारपेठेसाठी बंद झालेली गाडी पुन्हा सुरू होत आहे.
उन्हाळ कांद्याची आवक सुरू होत असताना लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. या स्थितीत देशांतर्गत बाजारात अधिकाधिक माल रवाना होणे गरजेचे आहे. तथापि, त्यात रेल्वेच्या काही निकषांमुळे अडथळे आले. परिणामी, तीन दिवस कांद्याची वाहतूक बंद पडली. द्राक्षाचा हंगाम प्रगतिपथावर असून मोबदला अधिक मिळत असल्याने मालमोटार चालक कांद्याऐवजी द्राक्ष वाहतुकीवर भर देतात. मोठय़ा प्रमाणात कांदा बाजारात येत असताना तात्काळ वाहतूक होण्यासाठी गाडी मिळणे आवश्यक आहे. गेल्या शनिवारी फतुवा, पाटणा (बिहार) विभागाने मार्ग निर्बंधाचे कारण देत जिल्ह्यातून रेल्वेद्वारे होणारी कांद्याची वाहतूक बंद केली. त्याचा परिणाम कांदा पडून असल्याने आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने दर गडगडण्यात झाला.
दोन दिवसांत कांद्याचे भाव ५०० ते ७०० रुपयांनी घसरले. रेल्वे गाडी उपलब्ध न झाल्यास ही श्रृंखला कायम राहण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन महाकिसान वृद्धी कृषी उत्पादक कांदा उत्पादकांचे फेडरेशन आणि शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. कांदा नाशवंत माल असल्याने त्याला हे निर्बंध लावू नये, अशी मागणी करण्यात आली. डॉ. पवार यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून बंद झालेली गाडी पुन्हा सुरू केली. यामुळे कांदा उत्पादकांचे संभाव्य नुकसान टळणार असल्याचे नितीन गायकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील नगरसूल, मनमाड, येवला, लासलगाव येथून कांद्यासाठी रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कांदा दर स्थिरावण्यास हातभार लागणार आहे.
The post कांद्यासाठी रेल्वेगाडी उपलब्ध appeared first on Loksatta.