‘अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात’

Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: अवकाळी पावसाने राज्यातील 17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारच्या राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाने विद्यमान सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल

“महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून ‘मायबाप’ सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी ‘सरकार’ असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे, पण महाराष्ट्रात चित्र उलटेच दिसत आहे. पावसाळय़ातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके व फळबागांची भयंकर हानी झाली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार?” असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा :  जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित

“अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात उभ्या असलेल्या कापसाच्या रोपांवरच वाती झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे हे पांढरे सोने तीन दिवसांतील पावसाने पुरते नष्ट केले. ज्वारीचे उभे पीकही आडवे झाले. नाशिक विभागात द्राक्षांच्या बागांचे तर अपरिमित नुकसान झाले. कांदा, टोमॅटो, केळी, पपईच्या बागा, ऊस, मका व नुकतेच डोके वर काढून तरारलेले गव्हाचे पीकही अवकाळीच्या तडाख्यात बरबाद झाले आहे. केवळ मराठवाडा आणि विदर्भच नव्हे, तर कोकणापर्यंतच्या शेतशिवारांमध्ये या अवकाळीने हाहाकार माजवला आहे. कांद्याबरोबर इतर भाजीपाला, हरभरा व काढणीस आलेल्या भाताचेही या पावसाने मोठे नुकसान केले. अवकाळी व गारपिटीच्या या तडाख्यात राज्यातील 17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित झाल्याचे राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच सांगितले आहे. अर्थात ही केवळ प्राथमिक माहिती आहे,” असं म्हणत ‘सामना’मधील अग्रलेखात महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही

“हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी तीन-चार दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असेच सुरू राहणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निसर्गाचे असे काय घोडे मारले आहे कळत नाही, पण गेली काही वर्षे सातत्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो आहे. ऐन पावसाळ्यात अवर्षणामुळे दुष्काळी परिस्थिती आणि पावसाळा संपल्यावर मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असे दुहेरी संकट कोसळत आहे. या सततच्या आपत्तींचा महाराष्ट्राच्या ग्रामीण जनजीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो आहे. जीव लावून, कष्ट करून, घाम गाळून पिकवलेली पिके व कर्जे काढून फुलवलेली शेतशिवारे व फळबागा डोळ्यांदेखत नेस्तनाबूत होत असताना शेतकऱ्यांना ज्या यातना व जे दुःख होत असेल, त्याची कल्पनाही करवत नाही. सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी खचला आहे. कधी सुदैवाने निसर्गाने साथ दिली आणि बंपर उत्पन्न झाले तर नेमके तेव्हाच या शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही,” असं ठाकरे गटाने शेतकऱ्यांची व्यथा मांडताना म्हटलं आहे.

हेही वाचा :  निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि....

सरकार कर्तव्यात कसूर करत असल्यामुळेच…

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशा बाता सरकार मारते; पण शेतकरी खरोखरच उत्पादन वाढवतो तेव्हा त्याच्या हाती काहीच उरत नाही ही वस्तुस्थिती आहे व त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाहीत. बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी आपला शेतमाल फेकून देत असताना, अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतमाल व बागा उद्ध्वस्त होत असताना वा दुष्काळामध्ये पिके करपून जात असताना जेव्हा शेतकरी संकटात सापडतो तेव्हा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र कटकारस्थाने, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि निवडणूक प्रचारात रमलेले सरकार या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळेच महाराष्ट्रात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने सत्ताध्यांना निशाणा करताना केली आहे.

बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे?

“सरकारची बेपर्वाई व अनास्था यामुळे शेतकरी इतके देशोधडीला लागले आहेत की, अवयव विक्री करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्यामुळे किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे. याच हिंगोली जिल्ह्याला आता अवकाळीचाही फटका बसला आहे. या संकटामुळे तिथे आता अवयव विक्रीसाठी रांगा लावण्याची वेळ येऊ नये, म्हणजे झाले. राज्यातील तमाम शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे?” असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

हेही वाचा :  “हॅलो मित्रा…”; ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापला अभिषेक बच्चन

मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना…

“महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत. पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?” असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

शेतकरी बेजार आणि सरकार पसार

“तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. ‘रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवत होता’ अशी एक ऐतिहासिक म्हण आहे. फरक इतकाच की, कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती,” असं अग्रलेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …