राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कालपासूनच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपा नेत्यांकडून केली जातेय. मात्र ही मागणी करताना नागपूरच्या भाजपा आमदाराची जीभ घसरलीय. या आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आज लकडगंज पोलीस स्थानकामध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दाखल केली. यावेळी भाजपाचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. तक्रार दाखल करुन पोलीस स्थानकाबाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आधी खोपडे यांनी नवाब मलिकांवर टीका केली. “ज्या दाऊदने या देशातील हजारो निर्दोष नागरिकांना मारलं त्याच्यासोबत नवाब मलिक यांनी संपत्ती खरेदीचा व्यवहार केला. म्हणूनच आम्ही आज या लकडगंज पोलीस स्थानकामध्ये नवाब मलिकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय,” असं खोपडे म्हणाले.
पुढे बोलताना खोपडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. मात्र यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बेशर्म आणि नालायक असे वादग्रस्त शब्द वापरले. “या दोन वर्षात खूप भ्रष्टाचार झालाय. त्यांचे (महाविकास आघाडी सरकारचे) अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म आणि नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगामध्ये असून सुद्धा त्याचा राजीनामा घेत नाही,” असं खोपडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
दरम्यान कालच माजी मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही मलिक यांना मंत्रीमंडळामधून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्षांविरोधात ईडीच्या कारवाईच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी फेटाळून लावलाय. “केवळ आपले अपयश झाकण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होतील अशी भिती असल्यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे,” असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेत.
“त्यांना (मलिकांना) ईडीने अटक केलीय ही फार गंभीर बाब आहे. ते अजूनही मंत्रीमंडळामध्ये का टिकून आहेत? खरं म्हणते त्यांना बडतर्फ काय तर हकलून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे,” असंही विखे-पाटील यांनी नवाब मलिकांबद्दल बोलताना म्हटलंय. “हा सगळा निर्जल्लपणाचा कळस आहे. त्यांना मंत्रीमंडळामधून बडतर्फ करण्याबरोबरच त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला हे कळत नाही की त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय?”, असा प्रश्न विखे-पाटील यांनी
The post “राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला appeared first on Loksatta.