नाशिक : बहुचर्चित पोलिस भरतीची वेबसाइट दोन-तीन दिवसांपासून दिवसभर बंद येत आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच उमेदवारांची ‘रात्रपाळी’ सुरू झाली आहे. रात्र-रात्र जागवून काही उमेदवारांनी पहाटे अर्ज नोंदविले असून, त्यानंतरही शुल्क भरण्यात अडथळे कायम आहेत.
राज्य पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मंजूर पदांच्या भरतीप्रक्रियेत सुरुवातीपासून गोंधळ सुरू आहे. रिक्त पदांचा बदललेला गोषवारा आणि नाशिकच्या जागा बृहन्मुंबईत वाढविण्यात आल्या. त्यामुळे हैराण झालेल्या उमेदवारांना अर्ज नोंदणीच्या अंतिम टप्प्यात मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. २०१९ पासून राज्य पोलिस दलात भरतीप्रक्रिया झालेली नाही. २०१९ मध्ये काही आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांच्या क्षेत्रात रिक्त पदे भरण्यात आली होती. त्यामुळे तीन वर्षे सलग रिक्त झालेल्या पदांची भरती आता होत आहे. करोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसह उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामध्ये नाशिक ग्रामीण दलात १६४ पोलिस शिपाई आणि १५ चालकांची भरती होत आहे, तर राज्यात १५ हजारांपर्यंत रिक्त जागा भरल्या जात आहेत. यामुळे लाखो उमेदवार नियमित अर्ज नोंदणीसाठी वेबसाइटवर जात आहेत. परंतु, यामुळे भरतीप्रक्रिया राबविण्याऱ्या ‘महाआयटी’ संस्थेचे नियोजन कोलमडले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंतच अर्ज नोंदणीची मुदत असून, शेवटच्या टप्प्यात वेबसाइट बंद असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे गृह विभागाने लक्ष देत अर्ज नोंदणीतील घोळ दूर करण्याची अपेक्षा आहे. यासह गृह विभागाने अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणीदेखील उमेदवार करीत आहेत.
– www.policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवर येतोय ‘द सर्व्हिस इज अनअव्हेलेबल’ असा मेसेज
-मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे वेबसाइट सुरू होते
-अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरताना ओटीपी येतो, पण पैसे वर्ग होत नाहीत
-परिणामी, पुन्हा नव्याने अर्ज नोंदणी करावी लागते
-यामुळे पुन्हा ‘सर्व्हर डाउन’ होत आहे
-नाशिक शहरासह ग्रामीण भागात उमेदवार रात्रभर जागरण करून करताहेत अर्ज नोंदणी
-पोलिसांनी दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यावर अपेक्षित उत्तरे मिळत नाहीत
अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यासाठी सगळी प्रक्रिया होऊन ओटीपी येतो. त्यानंतर सर्व्हर डाउन झाल्याचा मेसेज येतो. बँकेकडूनही शुल्क जमा झाल्याचे मेसेज येत नाहीत. यामुळे अर्ज नोंदणी रखडत आहे.-स्वप्नील वाघ, भरती उमेदवार
दिवसभर अर्ज नोंदणी करता येत नाही. वेबसाइट केव्हा सुरू होईल, याची खात्री नसल्याने रात्री जागी राहावे लागते. पहाटे साडेतीन-चारला वेबसाइटवर सुरू होते. पण, काही वेळातच सर्व्हर डाउन होतो.-अमोल पाटील, भरती उमेदवार