मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून शिपाई व वाहनचालक पदाच्या सुमारे एक हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली. या जागांसाठी एकूण ७४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतरच प्रत्यक्षात प्रथमच भरती प्रक्रिया होत असून, त्यासाठी आवश्यक तयारीदेखील प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे .
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच येथे शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची कमतरता होती. त्यामुळे मधल्या काळात काही महत्त्वाची पदे विविध जिल्ह्यांतून अधिकाऱ्यांच्या बदल्या करत भरण्यात आली आहेत.
यासह महाराष्ट्र सुरक्षा बलाचीदेखील मदत घेतली जात आहे. मात्र, तरीही मनुष्यबळाची गरज भासत असल्याने राज्य सरकारने भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिपायांची ९८६ पदे, तर शिपाई वाहन चालकांची १० पदे अशा एकूण ९९६ पदांसाठी नोव्हेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत सुरुवातीला देण्यात आली होती. या मुदतीत अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी आल्याने, ती १५ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली होती. या कालावधीत पोलिस आयुक्तालयाला शिपाई पदासाठी एकूण ७३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
यात ६० हजार ९८९ पुरुष आणि १२ हजार २३२ महिलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वाहनचालक पदासाठी एक हजार २३७ अर्ज आले आहेत. यात एक हजार १९६ पुरुष, तर ४१ महिलांच्या अर्जाचा समावेश आहे. असे एकूण ९९६ जागांसाठी ७४ हजार ४५८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण
पोलीस आयुक्तालयाकडून पुरुष उमेदवारांसाठी भाईंदर पश्चिमेचे नेताजी सुभाषचंद्र बोस मौदान, तर महिला उमेदवारांसाठी भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क चौपाटीलगतचे मैदान निश्चित करण्यात आले आहे. या मैदानांची देखभाल-दुरुस्ती, पाण्याची सुविधा व इतर आवश्यक तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कमी अर्ज आल्यास पुरुष व महिला उमेदवारांची नेताजी बोस मैदानावर एकत्रच चाचणी घेण्याचा प्रशासनाचा विचार होता. मात्र मोठ्या संख्येत अर्ज आल्यामुळे स्वतंत्र मैदानावर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे.