सकाळी मुंबईतून कोकणात निघालेले प्रवासी संध्याकाळपर्यंत महाडपर्यंतचे अंतरही गाठू शकले नव्हते.
अलिबाग : मुंबई- गोवा महामार्गावर कोलाड ते माणगावदरम्यान रविवारी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात जाणारे आणि कोकणातून येणारे प्रवासी अनेक तास अडकून पडले होते. सकाळी मुंबईतून कोकणात निघालेले प्रवासी संध्याकाळपर्यंत महाडपर्यंतचे अंतरही गाठू शकले नव्हते.
कोकणात शिमगोत्सव सांगता करून परतणारे मुंबईकर, दुसऱ्या बाजूने महाड चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यासाठी निघालेले आंबेडकरी अनुयायी आणि सोमवारी रायगड किल्ल्यावर शिवजयंतीसाठी येणारे शिवभक्त या तीन कारणामुळे रविवारी महामार्गावरील वाहनांची वर्दळ अचानक वाढली. दुपारी १२ नंतर कोलाड ते माणगाव दरम्यान वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते. माणगाव, इंदापूर शहरांलगत असलेला अरुंद रस्ता आणि शिस्त न पाळल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती. महाड शहरालगत वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली होती. बेशिस्त वाहनचालकांना आवर घालताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती़
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on mumbai goa highway zws