सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : ड्रग्स तस्कर ललीत पाटील याने पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात असताना ससून रुग्णालयातून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत एका पोलिस उपनिरीक्षकांसह (PSI) 9 पोलिसांचे एकाचवेळी तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मात्र धावत्या रेल्वेतून उडी मारुन पोलिसांच्या ताब्यात असताना एका आरोपीने पलायन केले होते. त्या प्रकरणात मात्र संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्यांना फक्त सक्त ताकीद देण्यात आल्याचे समोर आलं आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे उडी मारलेला आरोपी अद्याप फरार असून, तो जीवंत आहे की नाही हे देखील समोर आलेले नसताना हा पुणे पोलिसांना ताकीदनामा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
जून महिन्यात हा सगळा प्रकार घडला होता. त्यानंतर या प्रकरणात कमालीची गुप्तता बाळगत या पोलिसांना केवळ सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेतून उडी मारलेल्या प्रकरणातील पोलिसांवर एवढी मेहरबानी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
फरासखाना पोलिस ठाण्यात एका फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथे गेले होते. तेथून त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सौरभ प्रसन्नजीत माईत आणि संजय तपनकुमार जाना या दोघांना ताब्यात घेतले. पुढे त्यांना स्थानिक न्यायालयापुढे हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेसने पुण्याकडे आणण्यात येते होते. यावेळी हे दोन्ही आरोपी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचार्यांच्या ताब्यात होते.
त्यावेळी आरोपी संजयकुमार जाना याने शौचालयास जाण्याच्या बहाण्याने धावत्या रेल्वेतून शौचालयाच्या खिडकीतून उडी मारली. याप्रकरणी, नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार घडल्यानंतर कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. आरोपी पळून गेल्यानंतर संबंधीत कर्मचार्यांची चौकशी करून सुरुवातीला एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा प्रस्तावीत करून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्याबाबत संबंधितांना खुलास करण्यास सांगण्यात आले. त्यांनी खुलासा सादर केल्यानंतर तो अंशतः मान्य करून चक्क सक्त ताकीद ही शिक्षा देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
‘तो’ कर्मचारी तर वस्तीतला वसुलीभाई
धावत्या रेल्वेतून उडी मारून फरार झालेल्या प्रकरणात असलेले एक पोलRस कर्मचारी तर वसुलीभाई म्हणून चांगले प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणार्या बांग्लादेशी महिला आणि पुरुषांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान आत्तापर्यंत हा प्रकार फरासखाना पोलिसांना या भाईंच्या नजरेतून निदर्शनास येत नसल्याचे दिसून आले होते. हे भाई एवढे प्रसिद्ध आहे की त्यांना येथील प्रत्येक वाड्या-वस्तींचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून ते हे अर्थपूर्ण कर्तव्य बिनबोभाट बजावत असल्याची चर्चा आहे. बेकायदा शहरात वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांना यांचेच अभय तर नाही ना असा देखील सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाल्याप्रकरणी, नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अद्याप या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. रेल्वेतून उडी मारुन पळून गेलेल्या आरोपीचा अद्याप शोध सुरु आहे. मात्र त्याला घेऊन येणाऱ्या पोलिसांना सक्त ताकीद ही शिक्षा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.