गोव्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी नागपुरात आगमन झाले.
नागपूर : गोव्यामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपला हरवण्यासाठी कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्राला मुलाखत देत भाजपच्या पराभवासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्रा, गोव्याच्या जनतेने त्यांना नाकारले. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या जनतेने विकासाला मते दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजपचाच भगवा फडकणार आहे. आगामी महापालिकेवरही भगवा फडकवण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गोव्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी नागपुरात आगमन झाले. नागपूर भाजपतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी गडकरी बोलत होते. हॉटेल रेडिसन ब्लू चौकात झालेल्या या कार्यक्रमात माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे शहर व जिल्ह्य़ातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने या माध्यमातून एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले.
यावेळी गडकरी म्हणाले, चार राज्यातील जनतेने जात, धर्म, पंथ आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन केवळ विकासाला मते दिली. या यशानंतर विरोधक घाबरले आहेत. पाचही राज्यातील निवडणुका भाजपला कठीण जातील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरला. गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आजपर्यंत मिळाले नाही असे अभूतपूर्व यश भाजपला मिळाले आहे. लोकांना आता जातीवादाचे राजकारण नको, हे मतदारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आता शहरात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहे. शहराच्या विकासात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे योगदान आहे. शहरातील विकासकामांमुळे आपल्याला शक्ती मिळाली आहे. गोव्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात जसे यश मिळाले तसेच आगमी महापालिकेत मिळवण्यासाठी सर्वानी संकल्प करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
विरोधकांना त्यांची जागा दाखवली
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली. शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीन स्वप्न होते, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी त्यांनी ‘गोवा तो झाकी थी, महाराष्ट्र अभी बाकी है’, असा निर्धार करत महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी केला.
वाहतुकीचा खोळंबा
फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हॉटेल प्राईड ते रेडिसन हॉटेलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. मार्गावर विविध ठिकाणी फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीमुळे मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर खोळंबली होती.