या दोन्ही भेटींमुळे आता महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.
पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांचाही तणाव वाढला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यापालांच्या भेटीस पोहोचले आहेत.
आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडी सरकारचे काही नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी कोश्यारी यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. या भेटीनंतर लगेचच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा आमदार आशिष शेलार हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्याचं वृत्त हाती आलं आहे. खासगी कामासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भाजपची दमदार कामगिरी आणि उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शरद पवारांसोबत बैठक झाली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक युतीत लढवली होती, पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. युपीमध्येही शिवसेना काही करू शकलेली नाही.
महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार भाजप नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर ठाकरे-पवार भेट झाली. सोमवारी विधानसभेत या प्रकरणावरील आरोपांना राज्य सरकार उत्तर देण्याची अपेक्षा आहे. सरकारने आरोपांची पुष्टी करावी, असे पवार म्हणाले होते, तर फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या वर्षी महाराष्ट्रात महापालिका निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबई आणि आसपास राहणारे हिंदी भाषिक मतदार मोठी खेळी करू शकतात.