सोनू भिडे, नाशिक:-
पालकांचे दुर्लक्ष झाल्याने लहान बालक गरम पाण्यात पडून मृत्यू झालाय तर कुठे बाल्कनीतून पडून… पुन्हा या घटनेची पुरावृती झाली आहे. उकळत्या तेलाच्या कढईत पडून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
काय आहे घटना
समाधान निंबा पवार हे त्यांच्या कुटुंबीयासोबत नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील असलेल्या लखमापूर गावात राहतात. समाधान पवार यांचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे. २२ फेब्रुवारी रोजी ते व्यवसायाकरिता लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. त्यांच्या घरात सायंकाळी शेव काढण्याचे काम सुरु होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भट्टी वरील कढई खाली ठेवली. या कढईत उकळते तेल होते. याच ठिकाणी त्यांची सहा वर्षाची कन्या वैष्णवी खेळत होती. खेळता खेळता वैष्णवी कढई जवळ गेली आणि तिचा तोल गेला. जवळचा असलेल्या गरम तेलाच्या कढईत वैष्णवी पडली. तेल गरम असल्याने वैष्णवी भाजली होती. तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैष्णवीचा उपचारादरम्यान मृत्यू
वैष्णवीला लखमापूर येथील रुग्णालयात दाखल प्राथमिक उपचार करून नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दहादिवस मृत्यूशी झुंज देत तीन मार्चला वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने लखमापूर गावात शोककळा पसरली आहे.
यापूर्वीही साखर पाकात झालाय मृत्यू
घटना आहे 30 एप्रिल 2018 ची …शिरुडे कुटुंबीय नाशिकच्या हिरावाडी परिसरात वास्तव्यास आहे. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरात केटरिंग साठी लागणारे गुलाबजाम तयार करण्याचे काम सुरु होते. गुलाबजाम करिता लागणारा साखरेचा पाक तयार करून ती कढई बाजूला ठेवण्यात आली होती. पाकाच्या कढई जवळ तीन वर्षाची चिमुकली खेळत होती. कढईत काय हे बघण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा अचानक तोल गेला आणि ती गरम पाकच्या कढई पडली. उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता.
पालकांच्या दुर्लक्षामुळे घटना
लहान मुल चंचल असतात. त्यांच्याकडे सारखे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र पालकांचे दुर्लक्ष झाल्याने कुठे कॉईन नेलकटर, मणी अश्या छोट्या वस्तू गीळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात पालकांचे दुर्लक्ष झाल्याने अश्या घटना होत असल्याने या घटना झाल्या असल्याच डॉक्टरांनी म्हटलंय.