आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले
उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करण्यात येणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, असे म्हटले आहे. काही लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत, असे म्हटले आहे.
“आपल्या देशात भ्रष्ट्राचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे. भाजपाने २०१४ प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती. आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने २०१९ मध्ये आणखी आशीर्वाद दिला. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे. पण तटस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत. तपास यंत्रणांना थांबण्यासाठी हे लोक नवीन मार्ग शोधत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत. तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो. ही या लोकांची प्रवृत्ती आहे. हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात. कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात. मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा. हा पंथ मजबूत होईल, समाज मजबूत होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.
“उत्तर प्रदेशात अशा राजकारणामुळे लोकांनी मोठे नुकसान सहन केले आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या प्रेमान मला उत्तर प्रदेशचे बनवले आहे. मी वाराणसीचा खासदार असल्याच्या नात्याने मी अनुभवाने सांगतो की उत्तर प्रदेशचे लोकांनाही राज्याच्या विकासाला सर्वोच्च स्थान देण्याचे कळले आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा विचार करता, या निवडणूक निकालांना खूप महत्त्व आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भाजपाचा मोठा विजय २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक मोठा संकेत असल्याचे वर्णन केले आहे. या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांना सुशासन, जातीवादाऐवजी विकासाचे राजकारण हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे.