‘या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..’; राज ठाकरेंचा सूचक इशारा

Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांना देशभरामध्ये आदरांजली वाहिली जात आहे. बाबासाहेबांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा दिला जात आहे. दादरमधील चैत्यभूमीपासून संसदेच्या आवारापर्यंत सर्वच ठिकाणी बाबासाहेबांना मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांचा एक जुना फोटो शेअर करत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना एक खास संदेश दिला आहे.

महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की…

“सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात,” असं म्हणत राज ठाकरेंना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले,” असंही म्हटलं आहे.

हेही वाचा :  राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

एक फोटो इथे मुद्दामून…

“स्वराज्याची मुहूर्तमेढ याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य याच राज्यात आकाराला आलं. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील,” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे लिहिताना राज ठाकरेंनी, “हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,” असं म्हणत एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र बाजूबाजूला उभे असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा

“कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे,” असं म्हणत राज ठाकरेंनी सध्य परिस्थितीवर सूचक भाष्य केलं आहे. “यातून (या फोटोमधून) महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे याचं भान गमावू नये,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

हेही वाचा :  मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."

महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि…

“उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल,” असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी…

“आजचा महापरिनिर्वाण दिन यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस आहे,” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी, “पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन”, म्हणत पोस्टचा शेवट केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …