डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा सुरु झाली आहे. दरम्यान परीक्षेची वेळ सुरु होऊनही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार जिल्हयातील १२५ केंद्रावर या परीक्षा होत असून एकूण नऊ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
प्रवेशपत्र न मिळाल्याने बीटेक, बीए, एलएलबीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. विद्यार्थ्यांना पीएनआर नंबर सीट नंबरसमोर टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क दोन ते तीन महिने आधी घेतले जाते. विद्यापीठाकडे पुरेसा वेळ असताना प्रवेशपत्र का तयारी केली जात नाहीत? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. आता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात घेऊन पेपर लिहिण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरीही प्रवेशपत्र नसल्याने सुरुवातीच्या तासभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम एमए, एमएस्सी, एमकॉम; तसेच अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत. चार जिल्ह्यांत परीक्षेसाठी १२५ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक केंद्र औरंगाबाद जिल्ह्यांत आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नऊ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे.
दोन सत्रांत ही परीक्षा होईल. सर्व केंद्रांवर १२५ सहकेंद्रपमुख नेमण्यात आले असून, १० भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे,’ अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या अडचणी
अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत हॉलतिकीट मिळाले नव्हते. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करीत होते. परीक्षा मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू होत आहे, तरी सोमवारी सायंकाळी साडेसहापर्यंत हॉलतिकीट मिळाले नाहीत. रात्री हॉलतिकीट आले तरी ते मिळणार सकाळीच. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी काही तास आधी हॉलतिकीट मिळविण्यासाठी धांदल उडण्याची शक्यता आहे.
परीक्षा प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा संताप
वर्धा : मास्टर कॉलनीतील शालम नर्सिंग स्कूलमध्ये परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत प्रवेश पत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी परीक्षा असताना प्रवेश पत्र बोर्डाकडून आले नसल्याने अखेर सायंकाळीपर्यंत वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात संताप व्यक्त केला. यात पालक देखील संतप्त झाले. शालम नर्सिंग स्कूलच्या तब्बल १४० विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही. संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र काहीच दाद मिळत नसल्याने रात्री विद्यार्थी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचले.