Uddhav Thackeray Interview: मी सुद्धा पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो असं मोठं विधान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत असून, आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. ‘झी २४’ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी ‘टू द पॉईंट’मध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं.
इंडिया आघाडी ही तकलादू आघाडी आहे असं म्हटलं जात असून, निवडणुकीनंतर टिकणार नाही. तुमच्याकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नसून 5 वर्षात 5 पंतप्रधान देतील अशी टीका नरेंद्र मोदींनी केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “आमची आघाडी तकलादू आहे तर मग नरेंद्र मोदी रस्त्यावर का उतरले? आघाडी तकलादू असेल तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 25 ते 30 सभा का घेत आहेत? एकदा म्हणतात पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही, दुसऱ्यांदा म्हणतात हे दरवर्षी एक पंतप्रधान करतील. म्हणजे आमच्याकडे पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत”.
पुढे ते म्हणाले की, “5,10 किंवा 50 असतील. पण कधीही निवड असणं की नसणं जास्त चांगलं. त्यांच्या भाषेत बोलायचं गेल्यास एकच प्रोडक्ट तुम्ही किती वेळा लाँच करणार? पूर्वी हमाम साबण होता. हमाम आता नव्या रॅपमध्ये अशा जाहिरात केली जायची. पण आतला साबण तोच असायचा. यांचा रॅपही 2014 चा आहे. आम्ही रोजगार, पीकविमा देऊ असं सांगत ते 2014 च्याच जाहिराती परत करत आहेत. म्हणजे यांचं रॅपरही बदललेला नाही. आतला मालपण तोच आहे आणि आवरणही तेच आहेत. तुम्ही किती वेळा तेच प्रोडक्ट विकणार?”.
आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवार असून, सत्ता आल्यानंतर कळेल असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. दरम्यान संजय राऊतांनी उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत असं विधान केल्याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी ‘होऊ शकतात, आणखीही कोणी होऊ शकेल’ असं उत्तर दिलं. पुढे त्यांनी सांगितलं की, “आमच्या इंडिया आघाडीचं जे सूत्र ठरलं आहे, त्यानुसार कधी काय जाहीर करायचं याचा निर्णय झाला आहे”.
“मी वेडीवाकडी स्वप्नं पाहणाऱ्यांमधील नाही. त्यामुळे आमच्या इंडिया आघाडीचं जे काही ठरलं आहे, त्याला छेद जाईल असं कोणतंही भाष्य कऱणार नाही,” असंही उद्धव ठाके म्हणाले आहेत.